Header Ads

गांडुळखत निर्मिती बाबत संपूर्ण माहिती 2023। गांडुळखत प्रकार,फायदे आणि वापर

Gandulkhat: गांडूळखतनिर्मिती व गांडुळांची पैदास हा जसा शेतकऱ्यांसाठी आपल्या जमिनीची सुपीकता राखण्याचा एक मार्ग आहे तसाच तो एक व्यवसायदेखील आहे. अल्प भांडवलात, कमी जागेत किफायतशीर ठरणारा हा व्यवसाय आज स्वयंरोजगाराचे साधन ठरू शकतो. गांडूळखत हा सेंद्रिय खताचा एक प्रकार आहे. या व्यवसायाची माहिती करून घेण्याआधी गांडूळखताची निर्मिती व पैदास उद्योगाची व्याप्ती समजून घेऊ. 

गांडुळखत निर्मिती बाबत संपूर्ण माहिती 2023।गांडुळखत प्रकार,फायदे आणि वापर.





महत्वाचे मुद्द्धे- (gandulkhat)
गांडुळखत निर्मिती या लेखात खलील सर्व मुद्यावर सविस्तर माहिती दिली आहे👇

1) कचऱ्यापासून सोने👇

2) गांडुळांची पैदास-माती विकून पैसा :👇

3) गांडुळांची पैदास - पशुखाद्यासाठी उपयुक्तः👇

खतांचे प्रकार👇

1)रासायनिक खते :👇

१) मूळ खते (सरळ खते) :👇

२) मिश्र खते :👇

३) संयुक्त खते (संयोगिक खते) :👇

2)जिवाणू खत :👇

जिवाणू खतांचे प्रकार :👇

अ) अॅझोटोबॅक्टर :👇

ब) रायबोझियम जिवाणू खत :👇

क) निळे-हिरवे शेवाळ :👇

3)शेणखत :👇

4)कंपोस्ट खत : 👇

5)हिरवळीचे खत :👇

कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत थोडक्यात पाहू:👇

1) गांडूळखत व व्हर्मीवॉश👇

2) गांडूळखत व कंपोस्ट खत यामधील फरक : 👇

3) व्हर्मीवॉश :👇

चला तर मग पाहू सविस्त माहिती

गांडूळखत -रासायनिक खतांना पर्याय:

गेली अनेक शतके भारतीय शेतकरी सेंद्रिय खते वापरीत आहेत. त्यामुळे जमिनीची सुपीकता कायम ठेवली जाते. ब्रिटिशांनी त्यांच्या देशात तयार झालेली रासायनिक खते भारतीय शेतकऱ्यांना विकत घ्यायला भाग पाडले. सेंद्रिय खतांपेक्षा ती तुलनात्मक दृष्टीने स्वस्त असल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा स्वीकार केला. सेंद्रिय खते (शेणखत व कंपोस्ट) बनविणे शेतकऱ्यांना त्रासदायक वाटू लागले. तेव्हा सेंद्रिय खतांऐवजी रासायनिक खतांचा वापर वाढला, पण त्याबरोबरच रासायनिक खतांचे दुष्परिणामही जाणवू लागले. बागायती जमिनी खारवट झाल्या, पडीक झाल्या. त्यांची सुधारणा करणे खर्चिक झाले.

सध्या रासायनिक खतांचे भाव सामान्य शेतकऱ्यांना न परवडण्याइतके वाढले आहेत. शासनाने खतांच्या किमतीमध्ये दिलेल्या सवलती बंद केल्याने रासायनिक खतांचे बाजारभाव एकदम वाढले. तसेच परदेशांत रासायनिक खतांच्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यास परदेशातून आयात होणारी ही खते आणखी महाग होतील.

भावी काळात रासायनिक खतांच्या किमती दिवसेंदिवस वाढणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय खते वापरण्याशिवाय पर्याय नाही. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खते आवश्यक आहेतच. सेंद्रिय खतांमुळे पिकांच्या उत्पादनाची पातळी कायम ठेवता येतेच, किंबहुना ती वाढते.

जमीन निरोगी राहत असल्याने पिकेही निरोगी राहतात. पिके निरोगी राहत असल्याने पीक संरक्षणाच्या खर्चात बचत होते. पीक लागवडीचा खर्चही कमी होतो. म्हणूनच गांडुळांची पैदास व खतनिर्मिती उद्योगाला बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.

शेतीपूरक व्यवसाय वाचा सविस्तरपणे>>>>>

कुक्कुटपालन विषयी संपूर्ण माहिती । कुकुटपालन उद्योगाची ओळख 2023

 गांडूळखत 

1- कचऱ्यापासून सोने:

शहरांची भरमसाठ वाढ झाल्याने शहरांमधून कचऱ्याची समस्याही वाढली आहे. कचऱ्यामुळे प्रदूषणही वाढले आहे. भारतात दरवर्षी २५,००० लाख टन सेंद्रिय कचरा निर्माण होतो. ह्या कचऱ्यापासून खत बनवल्यास ४,००० लाख टन पिकांची अन्नद्रव्ये तयार होऊ शकतात. अशा खतनिर्मितीसाठी गांडुळांची चांगली मदत होऊ शकते. म्हणूनच गांडुळांची पैदास अशा कचऱ्यातून खतनिर्मिती उद्योगाला मदतकारक ठरू शकते. 

गांडुळांची पैदास-माती विकून पैसा :

गांडुळे खताच्या खड्ड्यात सेंद्रिय कचऱ्याचे रूपांतर कंपोस्ट खतामध्ये उत्तम प्रकारे करतात, पृष्ठभागाच्या मातीचे सुपीक मातीत रूपांतर करतात. ही माती कुंड्यांमध्ये झाडे लावण्याकरता उत्तम असते. त्यामुळे ही माती विकून पैसा मिळतो. शहरात अनेक हौशी लोक कुंड्यांमध्ये बाग करतात. अशा ग्राहकांना हेरून आपण एक स्वयंरोजगार करू शकतो.

 गांडुळांची पैदास - पशुखाद्यासाठी उपयुक्तः

गांडुळांची पैदास करून अशी गांडुळे, मासे, कोंबड्या व डुकरे यांच्यासाठी खाद्य म्हणून उपयोगात आणता येतात. अशा गांडुळांचा पशुखाद्य व्यवसाय अमेरिका, कॅनडा, जपान, इटली, फिलिपीन्स व तैवान या देशांत वाढला आहे. आपल्या देशात मात्र अजूनही या व्यवसायाला म्हणावी तशी बाजारपेठ उपलब्ध झालेली नाही.

या ठिकाणी आपण प्रामुख्याने गांडूळखत निर्मितीचा अभ्यास करणार आहोत. यासाठी खतांचे प्रकार आपल्याला माहीत असायला हवेत. ही माहिती पुढील प्रकरणात घेऊ.

खतांचे प्रकार

गांडूळखत व गांडूळ उद्योगाची व्याप्ती आपण थोडक्यात समजावून घेतली. आपण प्रामुख्याने गांडूळखत निर्मिती उद्योगाचा विचार करणार असल्याने आपल्याला खतांची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी इथे खतांची तोंडओळख करून घेऊ.

खतांचे सेंद्रिय खते व रासायनिक खते असे दोन मुख्य प्रकार आहेत; शिवाय जिवाणू खतेही पिकास नत्रांचा पुरवठा करण्यास वापरली जातात. आधी रासायनिक खतांची माहिती घेऊ. 

रासायनिक खते :

सेंद्रिय खते सर्व प्रकारच्या जमिनींकरता व पिकांकरता वापरता येतात. या खतांमुळे जमिनीची सुपीकता वाढते. त्यांचा परिणाम टिकाऊ असतो. त्यातील पोषक द्रव्ये पिकास हळूहळू मिळू शकतात. रासायनिक खतांतील पोषक द्रव्ये मात्र पिकांना तत्काळ उपलब्ध होतात. म्हणून सेंद्रिय खतांच्या जोडीला पिकांच्या वाढीस आवश्यक अशी पोषक द्रव्ये ताबडतोब व सहजतेने मिळण्यासाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो. 

रासायनिक खतांचे प्रकार :

१) मूळ खते (सरळ खते) :

या खतांमध्ये एकच पोषक द्रव्य असते. उदा. युरिया. या खतामध्ये फक्त नत्र ४६ टक्के असते.. 

२) मिश्र खते :

यात एकापेक्षा जास्त पोषक द्रव्ये एकत्र मिसळलेली असतात. उदा. १८ : १८ : १०. मिश्र खतांमध्ये १८ टक्के नत्रयुक्त खत, १८ टक्के स्फुरदयुक्त खत आणि १० टक्के पालाशयुक्त खतांचे एकत्र मिश्रण केलेले असते. म्हणजेच १०० किलो या मिश्र खतामध्ये १८ किलो नत्र, १८ किलो स्फुरद व १० किलो पालाश ही अन्नद्रव्ये असतात. 

३) संयुक्त खते (संयोगिक खते) :

या प्रकारच्या खतांमध्ये एक किंवा अधिक पोषक द्रव्ये रासायनिक प्रक्रियेने एकत्र केलेली असतात. उदा. डायअमोनियम सल्फेट, अमोनिअम क्लोराइड, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश, डाय- अमोनिअम फॉस्फेट, नायट्रो-फॉस्फेट व सुफला या नावाने मिळतात. आपण रासायनिक खतांची अत्यंत ढोबळ अशी माहिती घेतली. आता जिवाणू खतांची माहिती घेऊ.

जिवाणू खत :

पीक उत्पादनवाढीसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर करणे जरुरीचे असते. या खतांबरोबरच जिवाणूसंवर्धनाचा उपयोग केल्यास कमी खर्चामध्ये पिकास नत्राचा पुरवठा शेतकरी करू शकतात. जमिनीत वेगवेगळ्या प्रकारचे जिवाणू मोठ्या संख्येने असतात. हे जिवाणू वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करतात. त्यापैकी हवेतील नत्र स्थिर करण्याचे कार्य महत्त्वाचे आहे. ते कार्य रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, बायजेरिकिया आणि निळे-हिरवे शेवाळ करीत असतात. ही जिवाणू खते पिकांना नत्र मिळवून देतात. 

जिवाणू खतांचे प्रकार :

अ) अॅझोटोबॅक्टर :

हे जिवाणू एकदल आणि द्विदल पिकाच्या मुळाभोवती राहतात आणि  हवे मधून नत्र शोषून घेऊन पिकांना मिळवून देतात. एकदल धान्य जसे की ज्वारी आणि बाजरी व गहू, ऊस, मका, कापूस, सूर्यफूल हे  व तृणधान्य इत्यादी पिकांना या  खतांचा भरपूर प्रमाणात उपयोग होतो. आणि त्याचबरोबर  भाजीपाल्यासाठी या जिवाणू खताचा उपयोग होतो. 

ब) रायबोझियम जिवाणू खत :

मूग, मटकी, तूर, हरभरा, घेवडा, वाटाणा, सोयाबीन, भुईमूग या पिकांसाठी या जिवाणू खतांचा उपयोग होतो. हे जिवाणू द्विदलवर्गातील वनस्पतींबरोबर राहून कार्य करतात. 

क) निळे-हिरवे शेवाळ :

नत्र स्थिर करणारे अनेक प्रकारचे शेवाळे असतात. भातखाचरामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे शेवाळाची वाढ चांगली होते. शेवाळ वातावरणातील नत्रवायू स्थिर करून भाताच्या पिकास मिळवून देतात.गांडूळ किंवा गांडूळखत हादेखील एक जिवाणू खताचाच प्रकार. आपण या ठिकाणी खताचे प्रकार पाहत आहोत. गांडूळखतनिर्मितीच्या दृष्टीने याची तोंडओळख असणे आवश्यक आहे. म्हणून आधी सेंद्रिय खते नीट समजावून घेऊ. नंतर गांडूळखताचा आपण तपशिलात अभ्यास करणार आहोत. 

आता काही महत्त्वाचे सेंद्रिय खतांचे प्रकार पाहू. 

शेणखत :

आपल्या देशात जनावरांची संख्या बेसुमार आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या पिकांसोबत शेतकऱ्यांना काही प्रमाणात चाऱ्याची पिकेही घ्यावी लागतात, तसेच गवती कुरणेही ठेवावी लागतात. जनावरांपासून मिळणाऱ्या मिळकतीचा आर्थिक विचार केला तर बहुसंख्य जनावरे फायदेशीर होत नाहीत. जनावरांच्या शेण-मूत्राचा उपयोग शेणखत तयार करण्याकरता होतो. बरेच शेतकरी जनावरांपासून मिळणाऱ्या शेण-मूत्राचा व जनावरांना खाऊ घातल्यावर उरलेल्या कडब्याच्या गवताच्या उष्टावळीचा उपयोग शेणखत तयार करण्याकरता करतात. जनावरांच्या गोठ्याची रचना योग्य प्रकारे ठेवली तर रोजचे शेण-मूत्र व उष्टावळ एकत्र करून जवळच असलेल्या खड्ड्यामध्ये कप्प्याकप्प्याने भरल्यास ४-५ महिन्यांत चांगले कुजलेले शेणखत मिळू शकते. शेणखतामध्ये सेंद्रिय पदार्थ असल्यामुळे त्याचा पीकवाढीवर व जमिनीचा पोत सुधारण्यावर चांगला परिणाम होतो.

कंपोस्ट खत : 

शेतामध्ये वनस्पतींचे टाकाऊ अवशेष, काडीकचरा, पिकांची धसकटे, शेतातून काढलेले तण इत्यादी पदार्थ आणि शेणखत यांचा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी उपयोग होतो. 

 कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत थोडक्यात पाहू.

काडीकचरा, शेतातील तण, पिकांचे अवशेष इत्यादी एकत्र केले जातात. नंतर उंचवट्यावरील जमिनीत एक मीटर खोल, दोन मीटर रुंद अगर आवश्यकतेनुसार लांबीचा खड्डा खणून त्यात शेण आणि काडीकचरा यांचे आलटून-पालटून थर रचून खड्डा भरला जातो. जनावरांचे मूत्र आणि पाणी यांचे मिश्रण काडीकचऱ्याच्या व शेणकचऱ्याच्या प्रत्येक थरावर टाकले जाते. अशा प्रकारे थरथराने कंपोस्ट खड्डा जमिनीच्या दीड-दोन फूट वरपर्यंत भरून नंतर त्यावर मातीचा थर देऊन खड्डा बुजवला जातो. असा खड्डा भरल्यानंतर ५ ते ६ महिन्यांत खत चांगले कुजून तयार होते. 

हिरवळीचे खत :

ज्या ठिकाणी शेणखत, कंपोस्ट खत अपुरे पडते अशा वेळेस हिरवळीची खते वापरता येतात. पावसाळ्यामध्ये हिरवळीच्या खतासाठी ताग, ढेंचा, मूग, गवार, चवळी, उडीद इत्यादी पिकांची पेरणी करून पीक एक ते दीड महिन्याचे झाले असता फुलोऱ्यात असताना कापणी अगर काढणी करून नांगरटीच्या साहाय्याने जमिनीत गाडावे. हिरवळीच्या खतामध्ये नत्राचे प्रमाण ०.३३पासून ०.७३ टक्के, स्फुरदाचे प्रमाण १.१ ते २.० टक्के आणि पालाशचे प्रमाण ०.६ ते ०.८ टक्के इतके असते. हिरवळीची खते स्फुरद, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह इत्यादी सूक्ष्म द्रव्यात वाढतात. हिरवळीच्या पिकास स्फुरद खत घातल्यास पिकाची वाढ चांगली होते.

आतापर्यंत आपण खतांचे विविध प्रकार ढोबळमानाने पाहिले. आता  आपण गांडूळखताची माहिती घेणार आहोत.

३ गांडूळखत व व्हर्मी वॉश

गांडुळे अर्धवट कुजलेले पदार्थ खाऊन जी विष्ठा बाहेर टाकतात, त्या गोळ्यांच्या स्वरूपातील विठेलाच गांडूळखत असे म्हणतात. उत्तम प्रतीचे गांडूळखत कोरडे असताना वजनाला अत्यंत हलके, वासरहित किंवा मातकट वासाचे असते.

मागील प्रकरणात आपण कंपोस्ट खताची माहिती घेतली. ज्याप्रमाणे कंपोस्ट खत तयार करताना शेतामध्ये वनस्पतींचे टाकाऊ अवशेष, काडीकचरा, पिकांची धसकटे, शेतातून काढलेले तण इत्यादी पदार्थ कुजवले जातात, त्याच पद्धतीने गांडूळखत तयार करतानाही वनस्पतींचे अवशेष अर्धवट कुजवून ते गांडुळांना खायला घातले जातात. 

या दोन्ही पद्धतींत वनस्पतींचे अवशेष कुजवणे ही प्रक्रिया समान असल्याने आपल्याला गांडूळखत आणि कंपोस्ट खत यातील फरक समजावून घ्यायला हवा.

गांडूळखत व कंपोस्ट खत यामधील फरक : 

गांडूळ एखादा पदार्थ खाते आणि विष्ठेतून बाहेर टाकते, तेव्हा त्याच्या आतड्यातील द्रव त्या अन्नकणात मिसळला जातो. हा द्रव 'पाणी धारणक्षमता जास्त असणारा असतो. त्यामुळे विष्ठेतून बाहेर पडणारे कण या द्रवासहित असतात. म्हणूनच गांडूळखतात स्वाभाविकपणे जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. म्हणूनच हे खत ओलसर बनते तेव्हा त्याचा स्पर्श स्पंजाप्रमाणे लागतो, आणि स्पंज दाबल्यावर ज्याप्रमाणे पाणी पडते तसेच ओले गांडूळखत मुठीत धरून दाबले असता गळते.

कंपोस्ट खतामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता एवढ्या मोठ्या प्रमाणात नसते. गांडुळांच्या आतड्यातील द्रवामुळे गांडूळखतातील ही पाणी धारणक्षमता वाढलेली असते. तसेच कंपोस्ट खत बनवण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा किती तरी कमी वेळात गांडूळखत तयार होते. गांडुळाची विष्ठा म्हणजेच गांडूळखत हे आपण समजावून घेतले. आता व्हर्मी वॉश म्हणजे काय ते पाहू. 

व्हर्मीवॉश :

तयार गांडूळखतातून झिरपलेले पाणी म्हणजेच व्हर्मी वॉश होय. या व्हर्मी वॉश फवारणीचे पिकांवर अत्यंत उत्तम परिणाम दिसतात. याचे कारण म्हणजे एखादी वनस्पती वाढत असताना आवश्यक असलेली ३२ अन्नद्रव्ये वेगवेगळ्या प्रमाणांत, म्हणजेच वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणात शोषून घेते. अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त, तर लोह, मँगेनीज, जस्त इत्यादी अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असते.

वनस्पतींच्या अवशेषांतही हीच अन्नद्रव्ये त्याच प्रमाणात असतात. अर्धवट कुजतानादेखील अन्नद्रव्यांचे प्रमाण कुठेच बदलत नाही आणि शेवटी अर्धवट कुजलेले पदार्थ गांडूळ खाते व विष्ठा बाहेर टाकते. त्या वेळी खतातील फक्त एक टक्का अन्नद्रव्ये गांडुळे स्वतःच्या वाढीसाठी शोषून घेतात व उर्वरित ९९ टक्के अन्नद्रव्ये विष्ठेतून तशीच बाहेर टाकतात. साहजिकच अन्नद्रव्यांचे प्रमाण विष्ठेतही तसेच राहते.ही सर्व अन्नद्रव्ये गांडूळखतातून झिरपणाऱ्या पाण्यात विरघळतात.

सर्वसाधारणपणे पिकांना ज्या प्रमाणात अन्नद्रव्ये लागतात त्या त्या प्रमाणात अन्नद्रव्ये (मुख्य अन्नद्रव्ये जास्त व सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी) या पाण्यात असतात.

त्यामुळे हे पाणी पिकांवर फवारल्यावर पानांवाटे सर्व सूक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये शोषली जातात व अन्नद्रव्यांच्या कमतरता दूर झाल्याने व पोषण चांगले झाल्याने पिकांच्या वाढीवर त्याचा उत्कृष्ट परिणाम दिसतो.

आपण गांडूळखताची माहिती करून घेतली. आता पुढील प्रकरणात आपण गांडूळ या प्राण्याबद्दल समजावून घेऊ आणि त्यानंतर गांडूळखत निर्मितीची माहिती घेऊ.


खास तुमच्या साठी >>>>वाचा सविस्तर माहिती

कोंबड्यांमधील रोग आणि त्यांचे नियंत्रण 2023

How to start a business in india ? यशस्वी व्यवसायाचे 9 नियम

#Cavity Formation, #Hauling Farm,#गांडुळखत निर्मिती, #रासायनिक खत, #गांडुळखत प्रकार, #gandulkhat,


कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.